GRAMIN SEARCH BANNER

लांजा: सुरक्षित वाहतुकीसाठी स्वयंशिस्त महत्त्वाची – पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे

Gramin Varta
25 Views

लांजा – आपण स्वतः सुज्ञ नागरिक आहोत, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपली आणि इतरांची काळजी घेत सुरक्षित वाहन चालवल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न कधीच उद्भवणार नाही, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले. लांजा विधी सेवा समितीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

न्यायालय परिसरात आयोजित केलेल्या या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात वाहतूक समस्या आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना निरीक्षक बगळे यांनी वाढत्या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार ठरणाऱ्या नियमभंगावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळत अधिक सजग राहण्याचे आवाहन केले.

अनेकदा वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात, ज्यामुळे रस्त्यावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते, अपघातांचे प्रमाण वाढते आणि वाहतूक कोंडी अधिक गंभीर होते. या समस्या केवळ बेशिस्त वाहनचालकांमुळेच नव्हे, तर रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमुळेही वाहनांसाठी जागा कमी होते आणि परिस्थिती अधिक बिकट होते, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लांजा न्यायालयाच्या न्यायाधीश एस.आर. जोशी उपस्थित होत्या. याप्रसंगी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड, ॲड. संपदा मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत या विषयांवर अधिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम वाहतुकीचे नियम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला.

Total Visitor Counter

3379938
Share This Article