आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडली रोखठोक भूमिका
रत्नागिरी:आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘गाव विकास समिती’चे संघटन प्रमुख सुहास यांनी कठोर शब्दात हल्लाबोल चढवला आहे. निवडणुका विकासाच्या मुद्द्या येवजी पैशांच्या जोरावर झाल्या तर गावांचा विकास कधीच होणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.निवडणुका या केवळ पैशांच्या जोरावर न लढवता त्या विकासाच्या मुद्द्यांवर लढवल्या जाव्यात, अन्यथा गावांचा खरा विकास होणे अशक्य आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सुहास खंडागळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “आगामी जिल्हा परिषद निवडणुका जर मुद्द्यांच्या आधारावर झाल्या नाहीत आणि तिथेही पैशांचा महापूर आला, तर गावांचा विकास कधीच होणार नाही. हे सत्य गावात राहणाऱ्या प्रत्येकाने समजून घेणे काळाची गरज आहे.”
गावाच्या विकासाची व्याख्या केवळ रस्ते बांधणे इतकीच मर्यादित नसून, रोजगार, शेती,शिक्षण आणि आरोग्य हे कळीचे मुद्दे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले, “गावात रस्ते असतील पण लोकांना रोजगार नसेल, शेतीचा विकास नसेल, शिक्षण समस्या असतील,आरोग्याच्या समस्या सुटणार नसतील आणि मूलभूत सुविधाही नसतील, तर त्या विकासाचा काय उपयोग?”
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाव विकास समितीने उभारलेल्या बस स्टॉप वरील आमचे फोटो फाडण्याची मानसिकता याच पैशांच्या माजलेल्या वृत्तीतून येते.पैशाने मते विकत घेणारे हे लोकांना गृहीत धरतात,गुलाम समजतात.त्यांच्यासाठी राजकारण हा एक व्यवसाय आहे.राजकारण हा पैसे कमावण्याचे साधन नसून लोककल्याण करण्याचे माध्यम आहे असे खंडागळे यांनी म्हटले आहे.
मतदारांनी आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करू नये, असे आवाहन करताना खंडागळे म्हणाले की, “मतदार हा राजा आहे. त्याने आपल्या अमूल्य मतासाठी कुणाकडूनही भीक घेऊ नये.” निवडणुकीत पैशांना ठाम नकार द्या आणि विकासाला पसंती द्या, असा संदेश त्यांनी ‘गाव विकास समिती’च्या माध्यमातून दिला आहे.
निवडणूक काळात होणारा पैशांचा वारेमाप वापर थांबवून, केवळ जनहित आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन असणाऱ्या उमेदवारांनाच संधी मिळावी, अशी भूमिका गाव विकास समितीने घेतली आहे.







