रत्नागिरी : शहरालगतच्या भाटीमिऱ्या परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हिंसक झटापट झाली. या घटनेत कुऱ्हाडीचा प्रहार होऊन पिता व पुत्र जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत साहिल निलेश भाटकर (वय २३) व निलेश शंकर भाटकर (वय ४५, दोघेही रा. भाटीमिऱ्या, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस माहितीनुसार, तक्रारदार साहिल भाटकर आणि संशयित यांच्यात ८ डिसेंबर रोजी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून चंद्रशेखर अनंत कचरेकर (रा. भाटिमिऱया) याने कुऱ्हाड घेऊन तक्रारदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत कुऱ्हाड निलेश आणि साहिल भाटकर यांना लागून त्यांना दुखापत झाली.
याचवेळी संतोष अनंत कचरेकर (रा. भाटीमिऱ्या) याने तक्रारदारांना दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
भाटीमिऱ्या येथे किरकोळ वादातून कुऱ्हाडीचा वार; पिता-पुत्र जखमी






