मार्गताम्हाने : चिपळूण तालुक्यातील गुढे–जोगळेवाडी येथील गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रूद्र पांडुरंग आग्रे यांच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
रूद्र आग्रे हे शेतीच्या कामासाठी जात असताना गुढे–मोरेवाडी स्मशानभूमीजवळ अचानक समोर आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या हल्ल्यात गव्याने छातीत शिंग खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळी वनविभागाने पंचनामा करताना गव्याचे केस व पाऊलखुणा आढळून आल्या. त्यामुळे आग्रे यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यामुळेच झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविण्यात आला. त्यानुसार वनविभागाने नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू केली होती.
दरम्यान, या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे आणि विपुल कदम यांनी पाठपुरावा केल्याची माहिती चिपळूण शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख विक्रांत चव्हाण यांनी दिली.
गव्याच्या हल्ल्यात मृत्यू; आग्रे कुटुंबीयांना २५ लाखांची नुकसानभरपाई







