राजापूर : तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात आलेल्या स्मार्ट गाव संकल्पनेअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली होती.
तालुकास्तरीय देखरेख समितीकडून प्राप्त गुणांकन तसेच जिल्हास्तरीय तपासणी समितीने केलेल्या पुनर्मूल्यांकनात कळसवली ग्रामपंचायतीला सर्वाधिक गुण मिळाले. त्यामुळे जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा मान गावाला मिळाला आहे.
या यशामध्ये ग्रामसेविका सोनाली आराख, सरपंच देवेश तळेकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, बचत गटातील महिला तसेच ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे. गावातील सर्व घटकांनी एकत्र येत केलेल्या नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून कळसवली ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले जात आहे.





