विजयदुर्ग | प्रतिनिधी: रविवारी सकाळी मुंबईतील M2M टर्मिनल भाऊचा धक्का येथून निघालेली पहिली M2M रो-रो फेरी यशस्वीरित्या विजयदुर्ग बंदर येथे दाखल झाली. जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेत कोकण किनारपट्टीचा मनमोहक नजारा पाहत चाकरमानी व प्रवासी विजयदुर्गात पोहोचले. या ऐतिहासिक क्षणी पहिल्या मुंबई–कोकण M2M फेरीचे आणि प्रवाशांचे ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील सागरी वाहतुकीला नवे बळ देणारी ही सेवा भविष्यात नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पहिली M2M रो-रो फेरी विजयदुर्गात दाखल; चाकरमान्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत






