रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी (ता. रत्नागिरी) येथील धोकादायक उतारावर आज पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास डंपरचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४३ वाय ५९९८ क्रमांकाचा डंपर जयगड येथून मुंबईकडे कोळसा घेऊन जात होता. बावनदी येथील वळणदार उतारावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या उतारावर जाऊन पलटी झाला.
या अपघातात अलगुराय (वय ४०, रा. पाटणा, बिहार) हे चालक किरकोळ जखमी झाले. जखमी चालकाला तत्काळ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या मोफत रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली. घटनास्थळी हातखंबा पोलीस मदत केंद्र तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले होते. या प्रकरणी पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.
दरम्यान, बावनदी उतारावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
ब्रेकिंग: बावनदी उतारावर डंपर पलटी; चालक किरकोळ जखमी, मोठा अनर्थ टळला








