रत्नागिरी: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पोलीस दलाची गतीमानता वाढवण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा रत्नागिरी पोलीस मुख्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ही वाहने पोलीस दलाला समर्पित करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले की, जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कष्ट करत आहेत आणि त्यांना अत्याधुनिक सुविधा पुरवणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. नवीन वाहने ताफ्यात दाखल झाल्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढणार असून, गुन्हेगारांचा पाठलाग करणे आणि कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी तातडीने घटनास्थळी पोहोचणे आता अधिक सुलभ होणार आहे. भविष्यातही पोलीस दलाच्या सर्व गरजा आणि अडीअडचणी प्राधान्याने सोडवल्या जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
रत्नागिरी पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, यामुळे जिल्ह्यातील गस्त आणि सुरक्षा यंत्रणा अधिक वेगवान होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते नवीन वाहनांच्या किल्ल्या संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारींकडे सुपूर्द करण्यात आल्या.






