GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : काँग्रेस पक्ष कधीच महिला आरक्षणाच्या विरोधात नव्हता – ॲड. श्रद्धा ठाकूर

Gramin Varta
5 Views

रत्नागिरी: काँग्रेस पक्ष महिलांचा सन्मान करणारा असून, हा पक्ष कधीच महिला आरक्षणाच्या विरोधात नव्हता आणि नसेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे काम सर्वप्रथम काँग्रेसनेच केले होते.

आत्तादेखील लोकसभेच्या ५४३ जागांवर तातडीने महिला आरक्षण लागू करावे हीच काँग्रेसची सुरुवातीपासूनची मागणी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीस ॲड. श्रद्धा ठाकूर यांनी आज रत्नागिरीत केले. काँग्रेस भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भारतीय जनता पक्ष महिला आरक्षण लागू करण्यास इच्छुक नाही. म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक ते परिसीमनाशी जोडले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस पक्षाने पूर्ण पाठिंबा देऊन २०२३मध्ये महिला आरक्षण विधेयक पारित करण्यात मदत केली होती. आता सरकार घाईघाईत महिला विधेयकाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते; पण विरोधकांनी हा डाव हाणून पाडला,’ असे त्या म्हणाल्या.

पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना ७३व्या आणि ७४व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सर्वप्रथम ३३ टक्के आरक्षण देण्यात आले होते आणि पुढे यूपीए सरकारच्या काळात ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले होते. २०२३मध्ये महिला आरक्षण विधेयक मोठ्या बहुमताने मंजूर झाल्यानंतर ते २०२४च्या निवडणुकीपासूनच लागू करण्याची काँग्रेसची मागणी होती; मात्र ते २०२९पासून करणार असल्याचं सांगण्यात आले. आता त्याच्या आडून १३१वी घटनादुरुस्ती करण्याचा आणि अन्य दोन विधेयके आणण्याचा प्रयत्न करून महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विलंब करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न दिसतो, असेही ॲड. श्रद्धा ठाकूर म्हणाल्या.

महिला आरक्षणाबद्दल संसदेत चर्चा झालेली असताना विरोधी पक्षांबद्दल लोकांच्या मनात चुकीची भावना तयार होण्याकरिता महिलांना रस्त्यावर उतरवून मोर्चा काढण्यात आला,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

Total Visitor Counter

3313930
Share This Article