नवी दिल्ली: भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण करार असोत, ऊर्जा सुरक्षा असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणांविषयीचा पाठिंबा असो, दोन्ही देश पाच दशकांपासून एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
या संदर्भात रशियाने आपली चौथी एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली (सुदर्शन) भारताला पाठवली आहे. ही तिच संरक्षण प्रणाली आहे ज्यामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांना रोखण्यात आले होते. एस-४०० प्रणाली मे महिन्याच्या मध्यापर्यंत भारताच्या बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार सरकारकडून आणखी पाच एस-४०० प्रणालींच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. या प्रणालीची मारक क्षमता ४०० किलोमीटरपर्यंत आहे. सूत्रांनुसार, हिंदुस्थानी हवाई दलाचे अधिकारी रशियात दाखल झाले होते. १८ एप्रिलपर्यंत तपासणी पूर्ण करण्यात आली. गेल्या आठवड्यात ही प्रणाली रशियातून हिंदुस्थानच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सीमा भागात तैनात केली जाण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थानने आता आणखी २८० कमी आणि लांब पल्ल्याची एस-४०० क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरलेल्या क्षेपणास्त्रांची कमतरता भरून काढणे आणि शस्त्रांचा सुरक्षित साठा तयार करणे हा यामागील उद्देश आहे.





