रत्नागिरी: खाडी पट्ट्यामध्ये आज सायंकाळी निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पाहता पाहता त्याचे रूपांतर मोठ्या धुळीच्या वादळात झाले. यामुळे समोरचे दृश्य दिसणेही कठीण झाले होते, परिणामी रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला. या वादळानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे संपूर्ण परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या अस्मानी संकटामुळे ऐन हंगामात असलेला आंबा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बागांमधील आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडला असून झाडांच्या फांद्याही तुटल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास या वादळी पावसामुळे हिरावला गेल्याने आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. केवळ आंबाच नव्हे तर काजू आणि इतर पिकांचेही यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बागायतदारांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर एका तासाच्या पावसाने पाणी फेरले असून, या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की खाडी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून महावितरण प्रशासनाने संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा तातडीने खंडित केला. विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने यंत्रणेचेही नुकसान झाले असून, वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.






