रायगडातील ३१५ शाळा जीर्णावस्थेत; ९० हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Gramin Varta
2 Min Read

रायगड: नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ४७३ जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल ३१५ शाळांच्या इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, त्यामुळे ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शाळांच्या भिंतींना तडे गेले आहेत, छप्पर गळत आहेत, खिडक्या व पत्रे खराब झाली आहेत, तर काही शाळा जीर्ण अवस्थेत पोहोचल्या आहेत. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुरवस्था झालेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ कोटी ८३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद सेस फंड तसेच केंद्र शासनाच्या समग्र शिक्षण अभियानाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध झालेला नसल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार खालापूर तालुक्यात सर्वाधिक ३८ शाळांची दुरवस्था झाली असून अलिबाग आणि रोहा येथे प्रत्येकी ३५, पेण ३३, मुरूड २६, कर्जत व महाड प्रत्येकी २४, माणगाव २०, म्हसळा १९, सुधागड १८, पोलादपूर १४, उरण १०, पनवेल ८, श्रीवर्धन ६ आणि तळा तालुक्यातील ५ शाळांची अवस्था चिंताजनक आहे.

“जिल्हा परिषदेच्या काही शाळांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी विविध स्तरांवर निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून निधी उपलब्ध होताच दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील,” अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी पालक व शिक्षणप्रेमींनी केली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *