रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी घाट परिसरात कायमस्वरूपी एक जेसीबी आणि एक डंपर तैनात करण्यात आला आहे. नुकतीच घाटातील कोसळलेली दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी निवळी घाटात अचानक दरड कोसळल्याने महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने निवळी घाटात पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एक जेसीबी आणि एक डंपर कायम तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी दरड कोसळल्यास वाहने थेट दरडीवर आदळण्याचा किंवा मातीखाली गाडली जाण्याचा धोका असल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे.
प्रशासनाने वाहनचालकांना निवळी घाटातून प्रवास करताना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले असून, मुसळधार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्याचेही सांगितले आहे.
निवळी घाटातील दरड हटवली; आपत्कालीन परिस्थितीसाठी जेसीबी, डंपर तैनात
Leave a Comment
