खेड: जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार २०२४-२५’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवली यांना जाहीर झाला असून, नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, माजी सभापती अरुण कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, मानसी जगदाळे आणि रेवती पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि शाळेचा सर्वांगीण विकास यामुळे आंबवली शाळेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी आंबवली गावच्या सरपंच राजश्री यादव, उपसरपंच विजय यादव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्ष सिद्धी यादव तसेच शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर सर आणि उपशिक्षिका श्रीमती रेवाळे-खांडेकर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि पालकांनी शाळेच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून, शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
