खेड : कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारी पुन्हा एकदा कोलमडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या मार्गावरील महत्त्वाच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका २०११२ कोकणकन्या एक्सप्रेसला बसला, जी आधीच तीन तास उशिराने धावत होती आणि त्यात आणखी दोन तासांची भर पडून ती तब्बल ५ तास ४० मिनिटे उशिराने मुंबईत पोहोचली. कोकणकन्याच्या या विलंबामुळे मडगावकडे जाणारी १०१०३ मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेसही सहा तासांहून अधिक उशिराने धावू लागली. या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांच्या विलंबाचा थेट परिणाम मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर झाला असून, अनेक प्रवाशांचे नियोजित प्रवास फिस्कटले आहेत.
केवळ तांत्रिक कारणामुळे १०१०४ मडगाव-मुंबई मांडवी एक्सप्रेसदेखील अडीच तास उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या विलंबामागे पावसाचा जोर किंवा नैसर्गिक अडथळे नसून तांत्रिक आणि मानवनिर्मित कारणांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे अभ्यासकांच्या मते, कोकण रेल्वेची पुरेशी क्षमता नसतानाही कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा दिल्यामुळे वेळापत्रकावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. हा ताण कमी करण्यासाठी कोकणकन्या एक्सप्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द करावा किंवा मडगावहून सुटणारी ही गाडी किमान एक तास आधी सोडावी, अशी मागणी प्रवासी आणि रेल्वे जाणकारांकडून केली जात आहे. सध्या तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी, दिवसभर रेल्वेच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी होत असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच स्थानकावर जावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
