मुंबई: देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली असून गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदर दरम्यान येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून ही वाहतूक सेवा सुरू होणार आहे.
यामुळे मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर पोहचण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. ई-वॉटर टॅक्सी पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. सप्टेंबरमध्ये नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे, त्याआधी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचं नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यानुसार, दोन आठवड्यात ई-वॉटर टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए आणि डोमॅस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गावर नियमितपणे धावणार असल्याचे समजतेय. ई वॉटर टॅक्सीची सेवा फक्त एका मार्गासाठी मर्यादित न राहता टप्प्याटप्प्याने बेलापूर, घारापुरी आणि मांडवापर्यंत विस्तारित करण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे. या इ- वॉटर टॅक्सीची लांबी १३.२७ मीटर असणार आहे. याची रुंदी : ३.०५ मीटर असणार आहे.या टॅक्सीत २४ प्रवासी एकावेळी बसू शकतील इतकी प्रवासी क्षमता असणार आहे. टॅक्ससीचा वेग हा १४ नॉटिकल माइल्स इतका असणार आहे तर या टॅक्सीची बॅटरी क्षमता : ६४ किलोवॅट असणार असून ही चार तासापर्यंत चालू शकते.या ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्चात मोठी बचत होईल, त्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात याची सेवा मिळेल. शिवाय, शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासही यामुळे मदत होईल. मुंबई आणि नवी मुंबई यादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक वेगळा मार्ग मिळणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. परवडणाऱ्या दरामध्ये वॉटर टॅक्सीमधून प्रवास करता येणार असल्याचे समजतेय. मुंबईमध्ये धावणारी ही ई-वॉटर टॅक्सी विदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली आहे.
देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी ‘या’ तारखेपासून मुंबईत धावणार
