चिपळूण: गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पाटण शहरातून सुरू असून, या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कामाला १० जून अशी अखेरची मुदत देण्यात आली होती, मात्र ती उलटूनही दोन महिने झाले तरी काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना व नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर चिपळूण ते पाटण दरम्यान २३५ खड्डे पडलेले असून, दुर्दैवाने अनेक अपघात होत असताना संबंधित अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत.
त्यांच्या डोळ्यावरची झापड उडवण्यासाठी चिपळूणचे माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांनी संताप व्यक्त करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. श्री. मुकादम यांनी जागेवर जाऊन खड्ड्यांची पाहणी केली व यावर ताबडतोब खड्डे भरावे, खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित खाते जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला आहे. कराड-चिपळूण महामार्गावरील म्हावशी पेठ खरेदी-विक्री संघ पेट्रोल पंप ते मारुती मंदिर या दरम्यान नाल्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या ठिकाणी नाला आणि नव्याने बांधलेल्या काँक्रिट रस्त्यामधील जागा मुरुम, दगड किंवा गोटे टाकून भरण्याऐवजी थेट माती टाकण्यात आल्याचा आरोप नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
संबंधित कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नाला आणि काँक्रिट रस्त्यामधील जागेत मुरुम व दगड टाकण्याची तरतूद अंदाजपत्रकात आहे की माती टाकण्याची, याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी मुकादम यांच्याकडून होत आहे.




