नवी मुंबई: रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावच्या माहेरवाशीण सौ. शबाना शेकासन यांची मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या नवी मुंबई महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पनवेल येथील फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार कार्यक्रमात, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्यध्यक्ष अबरार मास्टर कच्छी यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी सौ. शबाना शेकासन यांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या शबाना शेकासन या काँग्रेसच्या माध्यमातून नवी मुंबईत अनेक वर्षे कार्यरत असून त्यांचे विविध संस्थांशीही घनिष्ठ संबंध आहेत. मानवी हक्कांची जाणीव व त्यांचा प्रसार हाच या संघटनेचा मुख्य हेतू असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही मशाल पोहचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्ण निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडणार आहे, अशी प्रतिक्रिया शबाना शेकासन यांनी दिली.
उक्षी गावच्या माहेरवाशीण शबाना शेकासन यांची मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या नवी मुंबई महिला अध्यक्षपदी नियुक्ती
