रत्नागिरी : ‘गोविंदा आला रे’ या जयघोषात आणि थरावर थर रचत, रत्नागिरी जिल्हा १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहीहंडीच्या रंगात रंगून जाणार आहे. यावर्षी जिल्ह्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून तब्बल २,७५० दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सार्वजनिक दहीहंड्यांपेक्षा खाजगी दहीहंड्यांचे प्रमाण अधिक आहे.
सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये लांजा तालुका अव्वल ठरला आहे. लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ८२ सार्वजनिक दहीहंड्या बांधण्यात येणार आहेत. राजापूरमध्ये ४० आणि दापोलीमध्ये ३८ दहीहंड्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. खेडमध्ये २४, चिपळूणमध्ये १७, देवगडमध्ये १२, पूर्णगडमध्ये १५, संगमेश्वरमध्ये ८ अशी संख्या आहे. सर्वात कमी सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये अलोरे-शिरगाव ६, सावर्डे २, गुहागर ३, बाणकोट १, दाभोळ ४, मंडणगड ३ अशा नोंदी आहेत.
खाजगी दहीहंड्यांमध्ये बाणकोट शहराने बाजी मारली असून तब्बल ३८९ हंड्या येथे लावल्या जाणार आहेत. त्यापाठोपाठ दापोली ३२७ आणि चिपळूण ३२० दहीहंड्या आहेत. विशेष म्हणजे, राजापूरमधील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही सार्वजनिक दहीहंडी नसतानाही ३० खाजगी दहीहंड्यांचा उत्साह दिसणार आहे. त्याखालोखाल गुहागर २२५, दाभोळ २५७, मंडणगड १२२, संगमेश्वर १२०, खेड १५० अशा नोंदी आहेत. सर्वात कमी खाजगी दहीहंड्या अलोरे-शिरगाव २५, सावर्डे ५२, राजापूर ७०, देवगड ५७ येथे आहेत.
रत्नागिरी शहरात १३ सार्वजनिक आणि ९४ खाजगी दहीहंड्या नोंदल्या गेल्या आहेत, तर ग्रामीण भागात १ सार्वजनिक आणि १२० खाजगी दहीहंड्यांचा उत्सव होणार आहे. या सर्व दहीहंड्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उत्सव सुरक्षित आणि आनंददायी पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे