देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील जनता विद्यालयाच्या एस.एस.सी. बॅच १९८६-८७ च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने २०२५-२६ मधील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व शाळेला भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेचे शिक्षक श्री. कदम सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी एस.एस.सी. बॅच १९८६-८७ चे सचिव श्री. सुनील करंबेळे यांनी संघटनेची स्थापना करण्यामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये उत्कृष्ट यश मिळविण्यासाठी इयत्ता आठवीपासून नियमित अभ्यास, शिस्त आणि मोबाईलचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला दिला. अध्यक्ष श्री. संतोष सुर्वे यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. माजी विद्यार्थी श्री. गजानन अणेराव यांनी शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि शिस्त यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यावेळी एसएससी परीक्षा २०२५-२६ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, मेडल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व एन.एम.एम.एस. परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्य व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. शाळेसाठी कुलर भेट देण्यात आला. यानिमित्त सर्वांचे संस्था व प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापकांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर यांनी एस.एस.सी. बॅच १९८६-८७ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा मिळून शाळा आणि माजी विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
