मंडणगडकरांची प्रतीक्षा संपली: ४२ कोटींच्या ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी

Gramin Varta
83 Views

मंडणगड: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मंडणगड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून, केंद्र सरकारच्या ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत ४१ कोटी ७० लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मंडणगडवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळात येथील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.

या योजनेच्या मंजुरीबाबत माहिती देताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, मंडणगड नगरपंचायतीच्या मागणीनंतर या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता मिळवणे आणि आवश्यक ना-हरकत दाखले प्राप्त करणे यांसारख्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसंख्येची वाढ आणि पर्यटनामुळे येणारी वाढीव गर्दी विचारात घेऊन या योजनेचे नियोजन करण्यात आले आहे.

आता या योजनेच्या निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामाला सुरुवात केली जाणार असून, वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंडणगडला भेट द्यावी, अशी विनंती खासदार तटकरे यांनी केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर मंडणगड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

Total Visitors :
4576141
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *