देवरुख : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवरुखमध्ये यंदा श्री जय हनुमान कांगणेवाडी गोविंदा पथकाने तब्बल १५ वर्षांनंतर सात थरांचा मानवी मनोरा उभारून आपल्या धाडसी आणि उत्कृष्ट सांघिक कौशल्याची दमदार सलामी दिली. देवरुखसह रत्नागिरी शहरातही या गोविंदा पथकाने सात थरांची यशस्वी रचना करत उपस्थितांची मने जिंकली.
गेल्या काही दिवसांपासून सातत्यपूर्ण सराव करणाऱ्या पथकातील गोविंदांनी शिस्त, समन्वय, धाडस आणि एकजुटीचे दर्शन घडवले. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या उत्साहपूर्ण घोषणा आणि उपस्थितांचा जल्लोष अशा उत्साहाच्या वातावरणात सात थरांचा मानवी मनोरा उभारण्यात आला. सातवा थर गाठताच परिसरात एकच जल्लोष झाला. विशेष म्हणजे पथकाने सात थरांचा मानवी मनोरा तब्बल पाच वेळा उभारून तो सुरक्षितपणे उतरवला.
देवरुखमधील दमदार कामगिरीनंतर श्री जय हनुमान कांगणेवाडी गोविंदा पथकाने रत्नागिरी शहरातही सात थरांची सलामी देत आपल्या कौशल्याची छाप उमटवली. रत्नागिरीतील साळवी स्टॉप परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडण्याचा मानही या पथकाला देण्यात आला. यावेळी पथकाच्या कामगिरीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
उंच मानवी मनोरा उभारताना आवश्यक असलेली सुरक्षितता, शिस्त आणि परस्परांवरील विश्वास यांचे पथकाने काटेकोरपणे पालन केले. प्रत्येक गोविंदाच्या अचूक समन्वयामुळे आणि सातत्यपूर्ण सरावामुळे सात थरांची ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाली.
श्री जय हनुमान कांगणेवाडी गोविंदा पथकाच्या या साहसी कामगिरीचे देवरुख आणि रत्नागिरी परिसरातून कौतुक होत आहे. पारंपरिक दहीहंडी उत्सवाला साहस, क्रीडा आणि सांघिक भावनेची जोड देत पथकाने १५ वर्षांनंतर सात थरांची दिलेली सलामी यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरली. पथकातील सर्व गोविंदांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि एकजुटीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
श्री जय हनुमान कांगणेवाडी गोविंदा पथकाची १५ वर्षांनंतर देवरुखमध्ये सात थरांची दमदार सलामी
Leave a Comment





