लांजा : मुंबई गोवा महामार्गावरील अंजनारी घाटी येथील काजळी नदी पुलानजिक आज सायंकाळी ४.३० च्या सुमारास भरधाव वेगाने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रक एका दरडीवर आढळून पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी बनला व महामार्गावरच आगीचे लोट उसळले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लांजा पोलिस, हातखंबा वाहतूक पोलिस व एम .आय. डी .सी .रत्नागिरी यांच्या तत्परतेमुळे फार मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात असले तरी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, RJ-GD-9798 हा ट्रक मुंबईहून केमिकल पावडर घेऊन गोव्याकडे जात होता मात्र आजणारी घाटीतील तीव्र उतारावर आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका ट्रक KL-29 T9721 याला जोरदार धडक देऊन महामार्ग सोडून दुसऱ्या मार्गीकडे गेला व आजणारी पुलानजिक एका दरडीवर आपटून पलटी झाला मात्र त्याच वेळी ट्रक ने अचानक पेट घेतला सुदैवाने यातील चालक व क्लिनर यांना बाहेर काढण्यात उपस्थित पोलिस व नागरिक यांना यश आले असून त्याला लांजा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस व हातखंबा वाहतूक पोलिस हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले व मदत कार्य करीत महामार्गावरील वाहतूक नियंत्रणात आणली व एकेरी वाहतूक सुरू केली. सुदैवाने समोरून कोणतेही वाहन आले नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अपघाताची माहिती मिळताच काही वेळातच रत्नागिरी औद्योगिक प्राधिकरण यांचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला व आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता. अचानक महामार्गावर ट्रक ल लागलेली आग व त्यातून उठणारे आगीचे लोट व धूर यामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालक यांच्यामध्ये भीतीने घबराट निर्माण झाली होती.
दरम्यान अंजनारी घाटीतील तीव्र उतारावर वारंवार अपघात होत असून वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजन झाली पाहिजे अन्यथा असे अपघात होऊन नाहक अनेकांचे बळी जातात अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत असून या बाबत महामार्ग व पोलिस प्रशासनाने त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. या अपघाताबाबत अधिक तपास लांजा पोलिस करीत आहेत.







