गोव्याच्या सहलीवरून परतताना काळाचा घाला; लांज्यातील भीषण अपघातात मुंबईचे कुरेशी कुटुंब क्षणात उध्वस्त

Gramin Varta
1408 Views

लांजा: गोव्याच्या सुखाद सहलीवरून मुंबईकडे परतत असलेल्या कुरेशी कुटुंबाच्या वाट्याला लांजा येथे नियतीने भीषण दुःख आणले. मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी शांतीनगर येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच ज्या घरात लग्नाची आनंदी वरात निघाली होती, तिथे आज या अपघातामुळे मयताचे दुःख कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नागपाडा येथील रहिवासी असलेले कुरेशी कुटुंब आपल्या खाजगी कारने (MH ०१-CP-८०२१) गोव्याहून मुंबईकडे परतत होते. लांजा येथील शांतीनगर रेस्ट हाऊस परिसरात पोहोचल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने महामार्गावर उभी असलेल्या डंपरला (MH ०५-EL-३८७७) पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर कार डंपरला घासत दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात यास्मिन इरफान कुरेशी (वय ५४), फिजा अनस कुरेशी (वय २७), महम्मद इरफान कुरेशी (वय १५) आणि चालक मुस्तफा अल्फाज काझी (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत अनस इरफान कुरेशी (वय ३१) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. लांजा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे मुंबईसह लांजा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4576139
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *