दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या पुनरुज्जीवनाची आशा

Gramin Varta
399 Views

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करणे आणि मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला २० डब्यांचा रेक उपलब्ध करून देणे या मागण्यांवर विशेष भर देण्यात आला.

सध्या दिव्यापर्यंत मर्यादित असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू झाल्यास रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो दैनिक प्रवाशांची गैरसोय दूर होणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमध्ये वाढत्या प्रवासी गर्दीमुळे २० डब्यांचा रेक देण्याची मागणीही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

बैठकीत कर्जत रेल्वे स्थानकात आठ महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय अमृत भारत योजनेअंतर्गत रोहा स्थानकाचे सुशोभीकरण, रोहा-पनवेल मार्गाला उपनगरीय रेल्वेचा दर्जा, मेमू गाड्यांची संख्या वाढविणे, दिवा-पेण-रोहा मेमू सेवा शनिवार-रविवारीही सुरू ठेवणे तसेच रायगड लोकसभा मतदारसंघातून धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांना किमान एक स्थानिक थांबा देण्याची मागणीही तटकरे यांनी केली.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने कोकणातील प्रवाशांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

Total Visitors :
4630017
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *