संगमेश्वर : तालुक्यातील कसब्यापासून शृंगारपूरपर्यंतचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा मानस आहे, असे उद्गार रत्नसिंधू समृद्ध योजनेचे उपाध्यक्ष विनय नातू यांनी काढले.
संगमेश्वर तालुक्याला कसबा, कळंबस्ते, फणसवणे, कारभाटले नायरी, तिवरे, शृंगारपूर, निवळी या गावांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा परिसर विकसित होण्याच्या दृष्टीने रत्नसिंधू समृद्धी योजनेचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी या भागाला भेट दिली. कारभाटले येथील ऐतिहासिक म्हाळोजीराजे घोरपडे यांच्या समाधीस्थळालाही त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
शासनाने केलेला कृती आराखडा तसेच आराखड्यानुसार अंदाजित रक्कमही सांगून ते म्हणाले की, समाधीस्थळ विकसित करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करेन. ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. गुहागर तालुक्यात पूर्वी काहीही नव्हते, परंतु पर्यटनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून आज गुहागर तालुक्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. पर्यटकही मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळाले याच्यासारखे समाधान कोणतेच नाही. त्याच धर्तीवर कसबा परिसराचा विकास करण्याचा मानस आहे.
यावेळी माजी जि. प. सदस्य दीपक जाधव, श्रीनिवास पेंडसे, श्रीरंग कुंभार, सरसेनापती म्हाळोजीराजेंचे वंशज घोरपडे बंधू, संतोष घोरपडे, सुरेश घोरपडे, हनुमंत घोरपडे, गणेश तावडे, पोलीस पाटील राजेंद्र घोरपडे, राहुल गुरव, महेंद्र होडे, बाळू होडे, शंकर खाडे, तसेच कारभाटले परिसरातील बंधूभगिनी उपस्थित होते.
संगमेश्वर : शृंगारपूरपर्यंतचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणार – डॉ. नातू
Leave a Comment






