रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. कोल्हापुरातून रत्नागिरीत येत असताना पाली येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील राजकीय, सामाजिक आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
राजेश सावंत यांनी भाजपच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावत अनेक वर्षे पक्षासाठी कार्य केले. दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि संघटन कौशल्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
राजेश सावंत यांच्यावर उद्या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; उद्या होणार अंत्यसंस्कार
Leave a Comment





