पुणे: ‘कोकणामध्ये व्हिएतनामच्या धर्तीवर संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन करण्यात यावे,’ अशी सूचना राज्याचे पणनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली.ते पुण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या संचालक मंडळाच्या सभेत बोलत होते.
या वेळी काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबेपाटील, शासन नियुक्त संचालक रूपेश बेलोसे, डॉ. परशराम पाटील आणि धनंजय यादव उपस्थित होते.
रावल म्हणाले की, कोकणामध्ये अपुऱ्या साठवणूक सुविधेमुळे ५००, १,००० आणि ५,००० मेट्रिक टन क्षमतेची गोदामे उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. काजू फळप्रक्रिया विकास योजना २०२३ अंतर्गत काजू बोंड रसावरील सामाईक प्रक्रिया केंद्र, जिल्हा स्तरावर आधुनिक मध्यवर्ती सुविधा केंद्र, तसेच ओले काजूगर काढणे व प्रक्रियेसाठी उभारण्यात येणाऱ्या केंद्रांना अर्थसाह्य देण्याच्या योजना शासनास सादर कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. सभेत कोकणात प्रकल्प उभारणी, ‘अपेडा’च्या धर्तीवर प्रकल्पांचे आधुनिकीकरण, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचे अर्थसक्षम अहवाल तयार करणे आणि गोदाम योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली.






