संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. येथील एका 35 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत आंबा फवारणीसाठी वापरले जाणारे विषारी रसायन प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महेश बळीराम ठीक (वय ३५, रा. वांद्री, ता. संगमेश्वर) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. महेश ठीक याने मद्याच्या नशेत असतानाच हे अत्यंत घातक रसायन प्राशन केले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्राशन केलेल्या विषाची तीव्रता अधिक असल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता महेश ठीक याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संगमेश्वर पोलिस ठाण्यात याबाबतची खबर देण्यात आली आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.
संगमेश्वर : वांद्री येथील तरुणाची विष प्राशनाने आत्महत्या







