देवरुख : चक्रभेदी सोशल फौंडेशन, देवरुख संस्थेच्या वतीने निराधार, विधवा व एकल महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने साडवली, गंगाधर नगर येथील ‘मायेचं हक्काचं घर’ या निवारा केंद्रात नुकताच एक विशेष उद्योग-व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने केक कापून या कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैदेही सावंत यांनी प्रस्ताविक केले आणि कार्यक्रमाचा उद्देश व महत्व स्पष्ट केले. विशेष म्हणजे, याप्रसंगी विधवा महिलांच्या हस्ते चुलीची पूजा करण्यात आली, ज्यातून महिलांच्या सन्मान आणि नवीन सुरुवात यांचा संदेश देण्यात आला.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मुगडाळ लाडू, रवा लाडू, चिवडा, शंकरपाळी यांसारखे फराळाचे पदार्थ बनवण्याचे कौशल्य शिकवले गेले. केवळ पदार्थ बनवण्यावरच लक्ष केंद्रित न करता, तयार वस्तूंना बाजारपेठेत आणण्यासाठी आवश्यक असलेले पॅकिंग, मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी श्रद्धा प्रसादे यांनी प्रशिक्षक म्हणून लाभ दिला आणि आपल्या कौशल्याचे ज्ञान महिलांना दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता व महाराष्ट्र राज्याचे नंदिवाले समाज संघटनेचे राज्यसचिव रावसाहेब चौगुले यांनी भूषवले. तसेच, जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी मा. वैदेही किर्वे यांची प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपंदा राणा, गुलनार पकाली, मनिषा बामणे, अख्तर जावेद, दिपाली जाधव, सिमा रेडिज आणि अवनी प्रसादे यांनी विशेष मेहनत घेतली. चक्रभेदी सोशल फौंडेशनचा हा उपक्रम निराधार महिलांना एक नवी दिशा देणारा, त्यांना आर्थिक आणि मानसिक बळ देणारा ठरला असून, समाजातील दुर्बळ घटकांना सक्षम करण्याच्या संस्थेच्या बांधिलकीची प्रचिती यातून येते. या प्रशिक्षणामुळे महिलांना व्यवसायाच्या संधी मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.







