GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर लोवले येथे कोरड्या विहिरीत 5 गवा रेडे अडकले; वन विभागाकडून यशस्वी रेस्क्यू

Gramin Varta
804 Views

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे लोवले येथे कोरड्या विहिरीत अडकलेल्या पाच रानगव्यांना वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ही घटना ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

लोवले येथील शेतकरी संतोष प्रदीप खेडेकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पाच रानगवे पडल्याची माहिती कृषी सहाय्यक समीर दोरखडे यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच संगमेश्वर–देवरुख परिमंडळाचे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक साहित्य घेऊन तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान सदर विहीर सुमारे १५ ते २० फूट खोल व अंदाजे १५ फूट व्यासाची असून त्यात पाणी नसल्याचे आढळून आले.

बॅटरीच्या उजेडात केलेल्या तपासणीत विहिरीत दोन पूर्ण वाढ झालेले रानगवे आणि तीन पिल्ले असे एकूण पाच रानगवे अडकले असल्याचे स्पष्ट झाले. विहिरीची उंची जास्त असल्याने त्यांना बाहेर पडणे अशक्य होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता एका बाजूने जेसीबीच्या सहाय्याने उताराचा मार्ग (रॅम्प) तयार करून रानगव्यांना नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला.

तयार करण्यात आलेल्या मार्गावरून सुमारे रात्री १.३० वाजता पाचही रानगवे सुरक्षितपणे विहिरीबाहेर आले. या रेस्क्यूदरम्यान कोणत्याही रानगव्याला इजा किंवा दुखापत झाली नसून एक मोठा नर, एक मादी आणि त्यांची तीन पिल्ले जंगलाच्या दिशेने सुरक्षितपणे निघून गेली.
हे रेस्क्यू ऑपरेशन माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडुकर, सुरज तेली आणि सहयोग कराडे यांनी सहभाग घेतला. रेस्क्यूदरम्यान मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते व त्यांनीही सहकार्य केले.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा कोणताही वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3388462
Share This Article