राजापूर / सिकंदर फरास: काँग्रेस पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. राजापूर-लांजा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नईद काझी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना मध्ये प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा महाराष्ट्राचे उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या वेळी बोलताना नईद काझी म्हणाले, “शिवसेना पक्ष हा विकासाभिमुख आणि जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असलेला पक्ष आहे. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात होत असलेले काम पाहून आम्ही प्रभावित झालो आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, “राजापूर तालुक्यात शिवसेना मजबूत होत असून युवक वर्ग मोठ्या संख्येने पक्षात दाखल होत आहे. नईद काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळेल,” असे त्यांनी नमूद केले. यांच्या सहित युवक से उपाध्यक्ष नायब बांधीलकर, एजाज बांधीलकर, मेहबूब वागू, सनद काझी,सनत काजी, साहिल बांधिलकर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचा भगवा हाती घेतला आहे.
आमदार किरण सामंत म्हणाले, “शिवसेना पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आदर आणि संधी मिळेल. आपण सर्वांनी एकत्र येऊन मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायचे आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य विलास चाळके, बंड्या साळवी, बाबू म्हाप, स्मितल पावसकर,दीपक नागले,राजापूर आणि लांजा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; युवक नेते नईद काझी यांचा शिवसेनेत प्रवेश
