GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरमध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला! सलग पावसामुळे तयार भातशेती भुईसपाट; शेतकरी हवालदिल

Gramin Varta
96 Views

संगमेश्वर : गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे येथील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली आणि तयार झालेली भातशेती सलग पावसामुळे वेळीच कापता न आल्याने अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. परिणामी, हातातोंडाशी आलेला भात पावसामुळे हिरावून जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
भात पिकाच्या नुकसानीबरोबरच जनावरांच्या वैरणचा प्रश्नही आता उभा ठाकला आहे. भात कापणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या वैरणीसाठी केला जातो. मात्र, पीक शेतात कोसळल्यामुळे आणि भिजल्यामुळे ही वैरणही निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे भविष्यात जनावरांसाठी वैरणीचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर भात कापणीचे काम शिल्लक आहे. मात्र, सततच्या पावसामुळे या कामात मोठा व्यत्यय येत आहे. उभे पीक पावसामुळे शेतातच कोसळल्याने ते कुजून जाण्याची भीती आहे. इतकेच नव्हे, तर तयार भाताच्या लोंब्यांना ओलाव्यामुळे पुन्हा अंकुर फुटू लागले आहेत, ज्यामुळे पिकाचे गुणवत्ता आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

शेतकऱ्यांचे झालेले हे प्रचंड नुकसान पाहता, शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महसूल आणि कृषी विभागाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बळीराजाला तातडीने आर्थिक मदत आणि दिलासा द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तीव्रतेने केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असून, शासनाच्या मदतीशिवाय त्याला उभे राहणे शक्य नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

Total Visitor Counter

3375483
Share This Article