रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडून बेपत्ता झालेल्या पेण (रायगड) येथील पर्यटकाचा अद्याप कोणताही शोध लागलेला नाही. नितीन शंकर पवार (वय ३५, रा. हमरापूर, पेण, जि. रायगड) हे शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समुद्रस्नानादरम्यान पाण्यात ओढले गेले आणि बेपत्ता झाले.
ही दुर्घटना घडल्यानंतर सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता; मात्र, पवार यांचा थांगपत्ता लागलेला नाही. जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड आणि गणपतीपुळे पोलिस चौकीचे कर्मचारी, जीवरक्षक, ग्रामरक्षक दल, पोलिस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने नितीन पवार यांचा शोध घेण्यात येत आहे.
पवार हे आपल्या कुटुंबासोबत गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते समुद्राच्या लाटांमध्ये ओढले गेले. या घटनेनंतर पवार यांचे नातेवाईकही तत्काळ गणपतीपुळे येथे दाखल झाले आहेत. नितीन पवार यांना शोधण्यासाठी गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, वरवडे, रीळ, उंडी या नजीकच्या तसेच सुमारे वीस किलोमीटरच्या समुद्रकिनारी युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे.





