देवरुख : आगामी देवरुख नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव विकास समितीने एक महत्त्वपूर्ण घोषणा करत शहरातील राजकारण ढवळून काढले आहे. गाव विकास समितीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करायच्या आधी ‘गाव विकास समितीचा शब्द’ देत, नगराध्यक्षपदावर समितीचा उमेदवार निवडून आल्यास देवरुख मधील प्रत्येक कुटुंबाला दररोज 300 लिटर पाणी पूर्णपणे मोफत पुरवण्याचा धडाकेबाज वादा केला आहे.
शब्द पाळणारी संघटना अशी गाव विकास समितीची ओळख असून नागरिकांच्या प्रश्नांवर ही संघटना नियमित आवाज उठवत असते.गाव विकास समिती ही निवडणूक स्थानिक युवा नेतृत्व डॉ. मंगेश कांगणे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहे. डॉ. कांगणे हे या निवडणुकीचे प्रभारी आहेत.
स्मार्ट मीटरद्वारे पारदर्शक बिलिंगची योजना:
केवळ मोफत पाणीच नव्हे, तर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि अधिक पाणी वापरणाऱ्यांसाठी गाव विकास समितीने स्मार्ट मीटर बसवण्याची योजना देखील जाहीर केली आहे. या धोरणानुसार, 300 लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास ‘जितका पाणी वापर तितकेच बिल’ आकारले जाईल, ज्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन साधता येईल, असे समितीने स्पष्ट केले आहे. जितके पाणी वापरले जाईल तितकेच बिल येईल. यामुळे नागरिकांची पाणीपट्टी सुद्धा कमी होईल असा विश्वास डॉ. मंगेश कांगणे यांनी व्यक्त केला आहे.
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड,कृषी तज्ञ व उपाध्यक्ष राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक गाव विकास समितीच्या माध्यमातून लढवली जात असून, 300 लिटर मोफत पाण्याचे हे आश्वासन निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकते. सौ दिक्षा खंडागळे गिते व सौ अनघा कांगणे या गाव विकास समिती कडून नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहे.






