दोन्ही बार्ज हटविल्याने अखेर आंबेत पूल मोकळा; तांत्रिक तपासणीनंतरच वाहतूक होणार सुरू

Gramin Varta
194 Views

मंडणगड: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ मार्गावरील सावित्री खाडीच्या पुलाला धडकलेल्या दोन बार्जपैकी पहिली बार्ज मंगळवारी सकाळी, तर दुसरी बार्ज सायंकाळी पुलापासून यशस्वीरित्या हटवण्यात आली आहे. दुसरे बार्ज चिखलात अडकल्याने ते काढण्यासाठी दोन हायड्रॉ बोट्सची मदत घ्यावी लागली, ज्यामुळे कामाला काहीसा विलंब झाला. या बार्ज हटवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित तांत्रिक यंत्रणांकडून पुलाची सखोल पाहणी केली जाणार आहे. या तांत्रिक तपासणीनंतरच पुलावरील वाहतुकीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

सध्या सुरक्षिततेच्या कारणास्तव पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि दुचाकी व लहान चारचाकी वाहनांसाठी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून असून परिस्थितीवर सातत्याने देखरेख केली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वाळू उत्खननाचा हंगाम नसताना या बार्ज खाडीपात्रात कशा आल्या आणि त्या निष्काळजीपणे कोणी ठेवल्या, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या अपघातामुळे पुलाचे नुकसान झाले असून, याची जबाबदारी कोण घेणार आणि नुकसान भरपाई कशी मिळणार, अशा प्रश्नांवरून संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Total Visitors :
4827567
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *