लांजा: पुनस गावचे सुपुत्र आणि गेली १६ वर्षे रत्नागिरी जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे ॲड. सूरज सदानंद मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयामार्फत जिल्हा न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी बार असोसिएशन या वकिलांच्या बारमधून जिल्हा न्यायाधीश म्हणून निवडून येणारे ते पहिलेच वकील आहेत.मुंबई उच्च न्यायालयातर्फे दरवर्षी जिल्हा न्यायाधीशपदासाठी परीक्षा घेतली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या टप्प्याने ही परीक्षा होते. या निवडप्रक्रियेला वर्षभराचा कालावधी लागतो. तसेच मुख्य परीक्षेचे दोन म्हणजे दिवाणी व फौजदारी हे पेपर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तपासतात. मुलाखतदेखील तेच घेतात. या तिन्ही परीक्षांमधून मार्गक्रमण करून ॲड. मोरे यांनी या पदाला गवसणी घातली आहे.गेली १६ वर्षे त्यांचा दिवाणी व फौजदारी खटले चालवण्यामध्ये हातखंडा असून खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे कामे चालवून गरजूंना न्याय मिळवून दिला आहे. आता ते जिल्हा न्यायाधीश म्हणून अत्यंत पवित्र समजले जाणारे न्यायदानाचे काम करणार आहेत.
लांज्याचे ॲड. सूरज मोरे जिल्हा न्यायाधीशपदी






