रत्नागिरी : साळवी स्टॉप परिसरातील जलतरण तलावाजवळील चहाच्या टपरीवर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ट्रकचालकाला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यात सतीश बब्रुवान नायकवडी (55, रा. साळवी स्टॉप) जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी सतीश नायकवडी चहा घ्यायला त्या टपरीवर गेले होते. त्याचवेळी तिथे ट्रान्स्पोर्ट कंपनीचा मॅनेजर आणि ट्रकचालक महेश घाटगे हे जमीन व्यवहारासंदर्भात चर्चा करत होते. या चर्चेदरम्यान नायकवडी यांनी ‘जमीन त्याच्या नावावर करा’ असा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला.
या क्षुल्लक कारणावरून संशयित यदुनाथ बाईग यांनी नायकवडी यांना ढकलाबुकल करत मारहाण केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत नायकवडी स्वतः रिक्षाने जिल्हा रुग्णालयात पोहोचले.
घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी साळवी स्टॉप येथे चहाच्या टपरीवर वाद; ट्रकचालकाला मारहाण




