रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जिल्ह्यात एकूण ६८.१४ टक्के इतके सरासरी मतदान झाले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गुहागर नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक ७५.२६ टक्के मतदान झाले, तर रत्नागिरी नगरपरिषदेत सर्वात कमी ५५.०९ टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली आहे. इतर शहरांमध्ये चिपळूण येथे ६४.१५ टक्के, खेडमध्ये ६२.५३ टक्के, राजापूरमध्ये ७४.५५ टक्के, लांजामध्ये ७१.०६ टक्के तर देवरुखमध्ये ७४.३३ टक्के मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ६० हजार ४६८ मतदारांपैकी १ लाख ४२६ मतदारांनी आपला हक्क बजावला असून यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या काही प्रमाणात अधिक असल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीदरम्यान रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील मतदान प्रक्रिया न्यायालयातील अपिलामुळे स्थगित करण्यात आली होती, ज्यासाठी आता २० डिसेंबर रोजी ४ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, झालेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशिन सुरक्षितपणे स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून तेथे एसआरपी आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने या सुरक्षा कक्षांचे सिक्युरिटी ऑडिट पूर्ण केले असून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा आणि पेस्ट कंट्रोलसह सर्व तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत.
मतमोजणीची प्रक्रिया सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरीसाठी संत गाडगेबाबा सभागृहात १६ टेबलवर, चिपळूणसाठी युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये १४ टेबलवर, तर इतर ठिकाणी पाच ते नऊ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत निकाल प्रसिद्ध केले जातील. मतमोजणी केंद्रांवर माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष माध्यम कक्ष उभारण्यात आले असून केवळ अधिकृत प्रवेशिका असलेल्या प्रतिनिधींनाच तिथे प्रवेश दिला जाईल. संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आणि निवडणूक यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.








