जाकादेवी / वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धवाडी येथे शेतकरी किशोर रामचंद्र पवार यांच्या पाळीव पाडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना शनिवारी (दि. १०) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पवार यांचे सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यास नेत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावर झडप घातली. या घटनेत पाडी जागीच ठार झाली, तर शेतकरी किशोर पवार थोडक्यात बचावले. घटनेची माहिती वनविभाग व पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली आहे.
कळझोंडी-वरवडे परिसरात मागील काही वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेक पाळीव जनावरे ठार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, सीसीटीव्ही व पिंजरे बसवावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







