रत्नागिरी : तालुक्यातील जयगड–निवळी रस्त्यावरील भोके मासेबाव येथे रिक्षा उलटून चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. १९) दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात आशिष नारायण साळुंखे (वय ३०), मयूर जामसुतकर (वय ३७), रणजित सुतार (वय ३७) आणि अमेय कुळे (वय ५१, रा. कोंढये, चिपळूण) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आशिष साळुंखे व अन्य तिघे सोमवारी रिक्षाने एका कार्यक्रमासाठी कोंढये (चिपळूण) येथून रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाकडे निघाले होते. गुहागर–आबलोली मार्गे प्रवास करत असताना भोके मासेबाव परिसरात चालक आशिष साळुंखे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षामधील चौघांनाही दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.








