रत्नागिरी : पुस्तकातील इतिहास प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहिला, की तो मनावर कायमचा कोरला जातो. याचाच प्रत्यय रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आला.
शाळेने आयोजित केलेल्या सातवीच्या एकदिवसीय अभ्यास सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी बारसू व देवाचे गोठणे येथील रहस्यमय कातळशिल्पे, प्राचीन सूर्यमंदिर आणि निसर्ग संवर्धनाचा थरार अनुभवला. ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची पर्वणीच ठरली.
देवाचे गोठणे व बारसू येथील सड्यावर कोरलेली हजारो वर्षांपूर्वीची कातळशिल्पे पाहून विद्यार्थी थक्क झाले. कातळशिल्प संशोधक मार्गदर्शक ऋत्विज आपटे व राधेय पंडित यांनी या शिल्पांमागील आदिमानवाचा इतिहास, प्राण्यांच्या आकृती आणि त्यांचे जागतिक महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. निसर्गयात्री संस्थेचे कातळशिल्प संशोधक सुधीर रिसबूड, तार्किक खातू यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक वारशाचे सखोल दर्शन घडले.
कशेळी येथील ऐतिहासिक कनकादित्य सूर्यमंदिर आणि देवाचे गोठणे येथील भार्गवराम मंदिराच्या भेटीतून विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख झाली. त्यानंतर पूर्णगड किल्ल्यावर जाऊन विद्यार्थ्यांनी शिवकालीन दुर्गस्थापत्य आणि भौगोलिक संरक्षणाचे महत्त्व अभ्यासले. सहलीचा शेवट गावखडी समुद्रकिनाऱ्यावरील कासव संवर्धन प्रकल्पाच्या भेटीने झाला. कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी होणाऱ्या कासव संवर्धन प्रकल्पाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. जिथे निसर्ग रक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या झाडांच्या बिया गोळा करून निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले.
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला कातळशिल्पांचा खजिना








