GRAMIN SEARCH BANNER

‘ई-केवायसी’ चुकली तरीही मिळणार लाडक्या बहिणींना लाभ; महिला व बालविकास सचिवांचे आदेश

Gramin Varta
197 Views

मुंबई: ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाडकी बहीण योजनेतून हजारो महिला अपात्र ठरल्या होत्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दीड हजार रुपयांचा लाभ बंद झाल्याने लाडक्या बहिणी संतप्त झाल्या असून, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनांचा भडका उडाला होता.

संतप्त लाडक्या बहिणींनी १९ जानेवारीला महिला बाल कल्याण कार्यलयात ठिय्या मांडला. २० जानेवारीला रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली.

अखेर या आंदोलनांची दखल घेत महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी बुधवारी राज्यातील सर्व महिला व बालविकास अधिकाऱ्यांची ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली. यावेळी ई-केवायसीमध्ये चूक झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पुन्हा पडताळणी करून त्यांना पूर्ववत लाभ देण्याचे स्पष्ट आदेश दिले. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे ३० हजार लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी शासनाने ऑगस्ट २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. योजना लागू करताना विविध अटी-शर्ती घालण्यात आल्या. सरत्या वर्षात, २०२५ मध्ये सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली. मात्र, पर्याय निवडताना झालेल्या चुकीमुळे राज्यातील लाखो महिलांचा लाभ थांबला.

महिलामधील वाढत्या असंतोषाची दखल घेत शासनाने तातडीने पावले उचलली. कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असे सचिव अनुपकुमार यादव यांनी ‘व्हीसी’ बैठकीत सांगितले. यात बुलढाण्यातील अधिकारी देखील सहभागी झाले.येत्या आठ दिवसांत नवीन मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन) जारी करण्यात येणार असून,ई-केवायसी चुकलेली,चुकीचा पर्याय निवडलेली

अशा महिलांची यादी तयार केली जाईल. अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून त्या महिलांचा दीड हजारांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे.

यापूर्वी एका रेशनकार्डवर दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्याने बाद ठरविलेल्या महिलांची ज्या पद्धतीने पडताळणी करण्यात आली होती, तीच प्रक्रिया आता ई-केवायसी प्रकरणातही राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3225176
Share This Article