रत्नागिरी (प्रतिनिधी): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान आधारित कृषी सल्ला जाहीर करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, २४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यात पर्जन्यमान नसून हवामान प्रामुख्याने कोरडे व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. विशेष म्हणजे, पुढील २४ ते ४८ तासांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून २८ जानेवारीनंतर पुन्हा तापमानात घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या हवामान स्थितीच्या पार्श्वभूमीवर, कृषी तज्ज्ञांनी आंबा आणि काजू बागायतदारांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या दमट आणि बदलत्या हवामानामुळे आंबा पिकावर तुडतुडे आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी मोहोर फुटण्याच्या अवस्थेत लॅम्बडा सायहॅलोथ्रीनची फवारणी करावी, तर भुरी रोगासाठी हेक्झाकोनॅझोल किंवा गंधकाचा वापर करावा. तसेच, किमान तापमान कमी राहिल्यास आंब्याला पुन्हा मोहोर येण्याची शक्यता असते, ज्यामुळे जुन्या मोहोरावरील फळगळ होऊ शकते; हे टाळण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हापूस आंब्याचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘आम्रशक्ती’ या विद्राव्य निविष्ठेचा वापर फायदेशीर ठरेल. काजू बागांमध्ये ‘टी मोस्किटो बग’ आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालवी आणि मोहोर येण्याच्या काळात योग्य कीटकनाशकांच्या फवारण्या वेळेवर पूर्ण कराव्यात.
फळबागांशिवाय इतर पिकांबाबतही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान कोरडे असल्याने मधुमका, चवळी, वाल आणि भाजीपाला पिकांना गरजेनुसार ६ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. मिरची, वांगी आणि टोमॅटो पिकांवर फुलकिडे किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायमेथोएट किंवा फिप्रोनिलची फवारणी करावी. हळद आणि काळीमिरी पक्व झाली असल्यास त्यांची काढणी करून योग्य पद्धतीने वाळवण करावी. पशुपालकांनी आणि कुक्कुटपालन करणाऱ्यांनी रात्रीच्या घटत्या तापमानापासून जनावरांचे व कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी गोठ्यात गोणपाटाचे पडदे लावावेत आणि उबदार वातावरण राखण्यासाठी विजेच्या बल्बचा वापर करावा, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्या तज्ञ समितीने केले आहे.








