रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये रत्नागिरी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे पाठवला आहे.यामुळे शिवसैनिकांमध्येही खळबळ उडाली आहे.
शिवसेना उबाठामधून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, सर्वसामान्य शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत असल्याचे नुकत्याच लागलेल्या निकालावरून दिसून आले. ठाकरेंचे अनेक उमेदवार काही शे मतांनी पराभूत झाले. परंतु, एकतर्फी लढत होऊ दिली नाही. प्रमुख नेते मंडळी तालुक्यात फिरलेली नसतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मशालीचा झेंडा खांद्यावर घेत ग्रामीण भाग पिंजून काढला होता. जवळपास 45 हजारहून अधिक मते ठाकरेंच्या सेनेने रत्नागिरी तालुक्यात मिळवली. ठाकरे म्हणजेच शिवसेना हे मानणारी आजही शिवसैनिक मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागात असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेखर घोसाळे यांनी तालुक्यात चांगल्या पध्दतीने बांधणी करण्यास सुरुवात केली होती. पदाधिकारी व शिवसैनिकांना विश्वासात घेत ठाकरेंच्या या लढवय्या कार्यकर्त्यांने तालुक्यात शिवसेनेची होणारी पडझड थांबवली होती. मात्र जि.प. व पं.स.चा पराभव जिव्हारी लागल्याने शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा राजिनामा जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्याकडे पाठवून दिला आहे. या राजीनाम्यानंतर ते म्हणाले की आपण ठाकरे प्रेमी असून यापुढे शिवसैनिक म्हणून काम करु मात्र कोणत्याही अन्य पक्षात जाण्याचे आपल्या मनातही येणार नाही. सर्वसामान्य शिवसैनिक तालुक्यात अजून ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच पक्षाचे काम प्रामाणिक करु असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी : ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा राजीनामा






