राजापूर: पंचायत समितीच्या निवडणुकीत धोपेश्वर गणातून भाजपचे उमेदवार अभिजित गुरव विजयी झाले. त्यामुळे तीन दशकांनंतर भाजपने पंचायत समिती सभागृहात प्रवेश केला आहे.
सन १९९५ साली भाजप कडून देवाचे गोठणे गणातून प्रकाश गुरव विजयी झाले होते. नंतर त्यांनी उपसभापतिपद भूषविले होते. त्यानंतर मात्र पंचायत समितीमध्ये भाजपचा एकही सदस्य नव्हता. देशासह अनेक राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपला गेल्या काही वर्षांत राजापूर तालुक्याला तेवढा जनाधार मिळालेला नाही. राजापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायती वगळता भाजपला जिल्हा परिषदेतही यश मिळवता आलेले नव्हते. यापूर्वी १९९५ मध्ये शिवसेना, भाजप युतीची सत्ता राजापूर पंचायत समितीवर आली होती. त्यावेळी शिवसेनेचे आठ तर भाजपचा एक असे नऊ सदस्य निवडून आले होते. त्यामध्ये देवाचे गोठणे पंचायत समिती गणातून महायुतीमधून भाजपचे प्रकाश गुरव निवडून आले होते. पुढे ते उपसभापतीदेखील झाले होते. त्यानंतर गेल्या तीन दशकाच्या कालखंडात राजापूर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या प्रत्येक निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढली होती. विधानसभा निवडणूकदेखील लढले होते. आता ३० वर्षांनी भाजपाला पंचायत समितीत प्रवेश मिळाला आहे.
राजापूर पंचायत समितीत ३० वर्षांनी भाजपाचा प्रवेश








