रत्नागिरी: नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांचा विजय म्हणे जनसामान्यांच्या विश्वासाची मोहर असल्याचे प्रतिपादन स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन केले.
श्री. थेराडे यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट दिली. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी संतोष थेराडे यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद प्राप्त केलेल्या दणदणीत विजयानिमित्ताने त्यांचे अभिनंदन करताना जनतेमधील नेत्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला मतदारांनी दिलेला हा कौल म्हणावा लागेल. या विजयामुळे संतोष थेराडे यांनी जनसामान्यांमधील आपले स्थान अधोरेखित केले. त्यांच्या दणदणीत विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना मनस्वी आनंद होतो, असे ॲड. पटवर्धन म्हणाले.
राजकारणापलीकडे जाऊन मैत्रीचे धागे जपावे लागतात. आमची मैत्री अनेक वर्षांची आहे. राजकारणातील भूमिका भिन्न असल्या तरी वैयक्तिक स्नेहाची भावना कधीच विरळ होणार नाही. निवडणूक संपली, आता राजकीय संघर्ष संपला. आता निखळ मैत्री जपत पुढे जाऊ, असे भावोद्गार ॲड. पटवर्धन यांनी काढले.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या विजयावर जनसामान्यांच्या विश्वासाची मोहर : ॲड. दीपक पटवर्धन






