रत्नागिरी: शिवजयंतीनिमित्त मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी गेलेल्या रत्नागिरीतील एका दहा वर्षीय शाळकरी बालिकेचा चक्कर येऊन पडल्याने गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. अस्मी मनोहर गोविलकर असे या मृत बालिकेचे नाव असून, या घटनेमुळे गोविलकर कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथून विद्यार्थी आणि पालकांचा सुमारे २५ ते ३९ जणांचा गट शिवजयंतीच्या सुट्टीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मालवण येथे गेला होता. या सहलीमध्ये अस्मी गोविलकर ही आपल्या आईसोबत सहभागी झाली होती.
गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यावर फिरत असताना कडक उन्हामुळे अस्मीला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. तिला तातडीने होडीच्या साहाय्याने मालवण किनारी आणून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. अस्मीला लहानपणापासूनच हृदयाचा आजार होता, अशी माहिती तिची आई मोहिनी गोविलकर यांनी डॉक्टरांना दिली. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







