GRAMIN SEARCH BANNER

जेष्ठ अनुभव–युवा ऊर्जेचा संगम : भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी तालुक्याची २१ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर

Gramin Varta
4 Views

रत्नागिरी /प्रतिनिधी :तालुक्यातील संघटनात्मक चळवळीला नवे नेतृत्व लाभले असून भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी तालुक्याची २१ सदस्यीय नवी कार्यकारिणी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. जेष्ठ अनुभव आणि युवा ऊर्जा यांचा संगम असलेली ही कार्यकारिणी आगामी काळात तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांना गती देणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तालुका अध्यक्षपदी सुनील जयराम पवार, सरचिटणीसपदी सिद्धार्थ गणपत जाधव, तर कोषाध्यक्षपदी तुषार भार्गव जाधव यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष (संस्कार) प्रितम दिपक सावंत, उपाध्यक्ष (पर्यटन प्रचार) राहुल विठ्ठल पवार, उपाध्यक्ष (संरक्षण) राजेंद्र काशिराम पवार यांच्यासह विविध विभागांसाठी सचिव, संघटक व इतर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये हिशोब तपासणीस नंदकुमार शिवराम यादव, कार्यालयीन सचिव म्हणून सुरेश रामचंद्र कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव (संस्कार) म्हणून राजेंद्र शिवाजी कांबळे व स्वप्नील भरत पवार, सचिव (पर्यटन) म्हणून आदेश तुकाराम कांबळे व अशोक विठ्ठल यादव, तर सचिव (संरक्षण) म्हणून संदीप शांताराम पवार व प्रमोद देवदास जाधव यांची निवड करण्यात आली. संघटक म्हणून संदेश रामचंद्र पवार, राहुल दिपक जाधव, जितेंद्र यशवंत सावंत, सुरेश जानू जाधव, दिलीप वामनराव वासनिक, सुभाष यशवंत कदम आणि सुधीर सुडकोजी जाधव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीमध्ये जेष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांचा समतोल साधण्यात आला असून अनेक पदाधिकारी संस्थेच्या विविध प्रशिक्षण शिबिरांमधून प्रशिक्षित झालेले आहेत. त्यामुळे संघटनात्मक शिस्त, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम या कार्यकारिणीच्या कामकाजात दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हाध्यक्ष अनंत विठ्ठल सावंत, सरचिटणीस एन. बी. कदम, कोषाध्यक्ष प्रदीप शांताराम जाधव, हिशोब तपासणीस सुनील गंगाराम पवार, कार्यालयीन सचिव विजय दौलत कांबळे तसेच संघटक तानाजी तुकाराम कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली.

दरम्यान, जिल्हा सरचिटणीस एन. बी. कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, रत्नागिरी तालुक्याची नवनियुक्त कार्यकारिणी ही जेष्ठ अनुभव आणि युवा जोम यांचा उत्कृष्ट मिलाफ आहे. संस्थेच्या विविध प्रशिक्षणांतून तयार झालेले हे कार्यकर्ते संघटनेच्या ध्येय-धोरण व नियमावलीला अनुसरून शिस्तबद्ध आणि परिणामकारक कामकाज करतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.

जिल्ह्यात भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महासभेचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असून, सामाजिक धार्मिक विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सक्रिय भूमिका बजावत असते. तालुका स्तरावरही नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून ही परंपरा अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Total Visitor Counter

3108155
Share This Article