रत्नागिरी: रत्नागिरीतील पतित पावन मंदिर, भागेश्वर मंदिर, गोशाळा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला.
भंडारी समाजाचे श्रद्धास्थान असलेले भागोजीशेठ कीर यांचा भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन श्री. सामंत यांनी दिले होते. त्यानुसार रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वारी साळवी स्टॉप येथे हा पुतळा उभारण्यात आला आहे.
व्यवसाय आणि दानशूरतेने रत्नागिरी शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या कार्याचे स्मरण करून देण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत एक प्रेरणादायी वारसा पोहोचवेल असा मला विश्वास आहे, असे श्री. सामंत यांनी अनावरण प्रसंगी सांगितले.
नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्यासह नगरसेवक, भंडारी समाजाच्या विविध मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.





